
मुंबईतील १०० पेट्रोल पंपांवर पेट्रोल, डिझेल दरवाढी विरोधात मुंबई काँग्रेसतर्फे स्वाक्षरी अभियान, मुंबईतील ६ जिल्ह्यांमध्ये सायकल यात्रा काढणार - भाई जगताप
मुंबईतील १०० पेट्रोल पंपांवर पेट्रोल, डिझेल दरवाढी विरोधात मुंबई काँग्रेसतर्फे स्वाक्षरी अभियान, मुंबईतील ६ जिल्ह्यांमध्ये सायकल यात्रा काढणार - भाई जगताप
केंद्रातील भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे झालेल्या पेट्रोल, डिझेल, एलपीजी गॅस दरवाढीमुळे प्रचंड महागाई वाढलेली आहे. या पेट्रोल व डिझेल दरवाढी विरोधात अखिल भारतीय काँग्रेस कमिटी च्या सूचनेनुसार संपूर्ण देशभरात काँग्रेसतर्फे आंदोलन करण्यात येणार आहे, त्याचाच एक भाग म्हणून बुधवार, ७ जुलै २०२१ ते १७ जुलै २०२१ या कालावधीत मुंबई काँग्रेसतर्फे मुंबईतील २२७ वॉर्डमध्ये पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस दरवाढ व त्यामुळे निर्माण झालेल्या प्रचंड महागाई विरोधात निषेध आंदोलन केले जाणार आहे. ही आंदोलने कोविड चे सर्व निर्देश पाळून केली जाणार असून, या आंदोलनांमध्ये मुंबई महिला काँग्रेसचा विशेष सहभाग असणार आहे. मुंबई काँग्रेसतर्फे दररोज मुंबईतील २३ वॉर्ड्स मध्ये निषेध आंदोलन केले जाणार आहे. तसेच मुंबईतील १०० पेट्रोल पंपांवर पेट्रोल, डिझेल दरवाढी विरोधात मुंबई युवक काँग्रेस, एन एस यु आय च्या प्रमुख उपस्थितीत स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येईल. तसेच या आंदोलनादरम्यान ९ जुलै ते १४ जुलै २०२१ या कालावधीत संपूर्ण मुंबईतील ६ जिल्ह्यांमध्ये मुंबई काँग्रेसतर्फे सायकल यात्रा सुद्धा काढण्यात येणार आहे, अशी माहिती मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी आज मुंबईत पत्रकार परिषदेत दिली. या वेळेस त्यांच्या सोबत मुंबई काँग्रेसचे कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा, सरचिटणीस संदेश कोंडविलकर व सहखजिनदार अतुल बर्वे उपस्थित होते.
भाई जगताप पुढे म्हणाले की, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सूचनेनुसार मुंबई काँग्रेसतर्फे १२ जुलै २०२१ पासून कोविड प्रभावित कुटुंबांना संपर्क करण्यासाठी अभियान राबविले जाणार आहे. या अभियाना अंतर्गत मुंबईच्या प्रत्येक वॉर्डमध्ये म्हणजेच २२७ वॉर्डमध्ये मुंबई काँग्रेसचे १० कार्यकर्ते कोविड प्रभावित कुटुंबांना भेट देणार असून त्यांच्या अडचणी व समस्या जाणून घेणार आहेत. दररोज १० प्रत्येकी काँग्रेस कार्यकर्ते १० कुटुंबांना भेट देणार आहेत. सदर अभियान ३० दिवस निरंतर सुरु राहणार आहे. मुंबईतील ६ ते साडे ६ लाख कुटुंबांपर्यंत मुंबई काँग्रेस या अभियानाच्या माध्यमातून पोहचणार आहे. त्यामध्ये मुंबईतील गरीब कष्टकरी, श्रमिक, ऑटोरिक्षा चालक, घरेलू कामगार, मॅकेनिक, फेरीवाले, शिक्षक इत्यादी कुटुंबांचा या संपर्क अभियानात समावेश करण्यात आला आहे. या कुटुंबांकडून माहिती घेऊन त्यांना मुंबई काँग्रेसतर्फे यथोचित सहकार्य करण्यात येईल.
भाई जगताप पुढे म्हणाले की, मुंबई महानगरपालिकेतर्फे संपूर्ण मुंबईतील सोसायट्यांवर लावण्यात येणारे अतिरिक्त अग्निशमन सेवा शुल्क रद्द करावे अशी आम्ही यापूर्वी मागणी केली असून या मागणीचे पत्र आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर व मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांना लिहिले होते. मुंबईकर नियमितपणे जो मालमत्ता कर मुंबईकर भरत आहेत त्यात अग्निशमन सेवा शुल्क समाविष्ट आहे. मग हा अतिरिक्त अग्निशमन सेवा शुल्काचा बोझा मुंबईकरांवर कशासाठी लादला जात आहे? मुंबई काँग्रेसचा याला कायम कडाडून विरोध आहे. मुंबई महानगरपालिकेत आम्ही विरोधी पक्षात आहोत. त्यामुळे हा अतिरिक्त अग्निशमन सेवा कर आम्ही लागू होऊ देणार नाही, अशी माहिती भाई जगताप यांनी दिली.