
आजचे आंदोलन जनमानसाच्या मनातील मोदी सरकारच्या धोरणाच्या विरोधात उद्रेक आहे - आमदार भाई जगताप !
आजचे आंदोलन जनमानसाच्या मनातील मोदी सरकारच्या धोरणाच्या विरोधात उद्रेक आहे - आमदार भाई जगताप !
आज कोवीड ची दुसरी लाट जगभरात पसरलेली असताना, प्रत्येक देश आपल्या नागरिकांचे मोफत लसीकरण करत आहे. पण ज्या भारतामध्ये सर्वात जास्त लसींची निर्मिती केली जाते, त्या देशातील लोकांना लस मिळत नाही. लसीसाठी पैसे मोजावे लागत आहे. कारण या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लसी अगोदरच इतर देशांना पाठवल्या, हे या देशाचे सर्वात मोठे दुर्दैव आहे, यासाठी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रातील भाजप सरकारचा निषेध करतो, असे वक्तव्य मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी आज मुंबईत केले. मुंबई काँग्रेसतर्फे संपूर्ण मुंबईभर पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रातील भाजप सरकार विरोधात 'मोदीजी हमारे बच्चो कि वॅक्सीन को विदेश क्यों भेज दिया?' हे आंदोलन केले जात आहे. मुंबईतील महालक्ष्मी मंदिर परिसरात करण्यात आलेल्या आंदोलना दरम्यान भाई जगताप बोलत होते. या आंदोलनामध्ये भाई जगताप यांच्या समवेत मुंबई काँग्रेसचे उपाध्यक्ष सुनील नरसाळे, सरचिटणीस सुशीबेन शाह, दक्षिण मुंबईचे जिल्हाध्यक्ष प्रमोद मांद्रेकर, सहखजिनदार अतुल बर्वे, मुंबई काँग्रेसचे सर्व स्थानिक नेते व कार्यकर्ते सहभागी झाले होते. तसेच महिला कार्यकर्त्यांचा या आंदोलनामध्ये मोठा सहभाग होता.