
बांधकाम कामगारांसाठी रिपाईचा आझाद मैदानात मोर्चा !
बांधकाम कामगारांसाठी रिपाईचा आझाद मैदानात मोर्चा !
बांधकाम कामगारांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी 22 फेब्रुवारी रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले ) कामगार आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप भाऊ कांबळे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईच्या आझाद मैदानात आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले आहे. कारखानदारी क्षेत्रात स्थानिक कामगारांना प्राधान्य मिळालेच पाहीजे, कारखानदारी क्षेत्रात कामाची वेळ आठ तास कायमस्वरूपी करण्यात यावी. फॅक्टरी अॅक्ट 1948 कामगार कायद्यानुसार वेतन, रजा, बोनस व इतर सुविधा कारखानदार कामगारांना मिळाल्याच पाहिजेत. त्याचप्रमाणे कारखानदार कामगारांना कारखानदार मालकांनी भविष्य निधी कामगार विमा दिला पाहिजे. ठेकेदारी पद्धत बंद करण्यात यावी. हॉटेल कामगार घरेलू महिला कामगार हमाल कामगार , महिला कामगार, सफाई कामगार यांना शासनाच्या योजनेचा लाभ त्वरित मिळाला पाहिजे.
खाजगी वाहन चालक कामगारांना शासनाकडून संरक्षण विमा मिळण्याची तरतूद करण्यात यावी त्याचप्रमाणे बांधकाम कामगारांना मेडिक्लेम योजना चालू करण्यात यावी. बांधकाम कामगारांना मदत म्हणून पंचवीस हजार रुपये मंजूर करावी तर दिवाळीला दहा हजार रुपये बोनस देण्यात यावा. बांधकाम कामगारांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असल्यास त्याच्या वारसास दहा लाख रुपये विमा संरक्षण द्यावे. बांधकाम कामगारांना पाच हजार रुपये अनुदानाची योजना पूर्ववत सुरू करावे त्याचप्रमाणे घरकुल योजनेची अंमलबजावणी करण्यात यावी तसेच बांधकाम कामगार यांच्या मुलींच्या विवाहासाठी एक लाख रुपये निधी मंजूर करण्यात यावा आदी मागण्यांसाठी येत्या 22 फेब्रुवारी रोजी रिपाइं आठवले गटाचे कामगार आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप भाऊ कांबळे यांच्या नेतृत्वाखाली आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
या मोर्चात शेकडोंच्या संख्येने रिपाई कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.