मिठाई मध्ये भेसळ करणाऱ्या दुकांनदारावर कारवाई करणार आरोग्य राज्य मंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर !

मिठाई मध्ये भेसळ करणाऱ्या दुकांनदारावर कारवाई करणार आरोग्य राज्य मंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर !

         दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मिठाईसह विविध अन्न पदार्थातील भेसळ रोखण्याचे आणि खाद्य तेलाच्या डब्यांचा पुर्नवापर करणाऱ्यांवर कडक कारवाईचे निर्देश आरोग्य राज्य मंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी अन्न व औषध प्रशासनच्या अधिकाऱ्यांना दिले. यासंदर्भात मंत्रालय मुंबई येथे अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. यावेळी राज्यातील अन्न व औषध प्रशासनाची विभागवार सद्यस्थिती जाणून घेत भेसळ विरोधातील मोहीम अधिक तीव्र करताना भेसळखोरांवर कडक कारवाई करण्याबाबत महत्वपूर्ण सूचना यड्रावकर यांनी दिल्या. दिवाळी सण जवळ आला असताना खवा (मावा), पनीर, खाद्यतेल, मिठाईसह विविध अन्न पदार्थातील भेसळ रोखण्यासाठी उपाययोजना, खाद्यपदार्थातील भेसळ ओळखण्यासाठी जनजागृती, तसेच भेसळ करणारी दुकाने, कंपन्या, आस्थापना, दुकानदारांवर थेट धाडी टाकून कडक कारवाई करण्याचे निर्देश यावेळी दिले, प्रसंगी त्यांचे परवाने निलंबित करण्याची कारवाई करावी अशा सूचना केल्या.

      अन्न सुरक्षा व मानदे कायद्यानुसार खाद्य तेलाचे पॅकिंग करण्यासाठी एकदा वापरलेल्या डब्यांचा पुर्नवापर करण्यास प्रतिबंध आहे, परंतु राज्यात सर्रासपणे सुरू असलेल्या डब्यांच्या पुर्नवापराबाबत तीव्र नाराजी व्यक्त करून उपस्थित अधिकाऱ्यांना यावर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. याबरोबरच सदर कारवाई संदर्भात अहवाल तत्काळ सादर करण्याचे निर्देशही दिले.   यड्रावकर यांनी पार पडलेल्या आढावा बैठकीस वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाचे सह सचिव श्री. शिवाजी पाटणकर, अन्न व औषध प्रशासन आयुक्तालयाचे सहआयुक्त श्री. शैलेश आढाव, बृहन्मुंबई विभागाचे सहआयुक्त श्री. शशिकांत केकरे, कोकण विभागाचे सहआयुक्त श्री. शिवाजी देसाई, पुणे विभागाचे सहआयुक्त श्री. सुरेश देशमुख, नाशिक विभागाचे सहआयुक्त श्री. चंद्रशेखर साळुंखे, औरंगाबाद विभागाचे सहआयुक्त श्री. उदय वंजारी, अन्न व औषध प्रशासन आयुक्तालयाचे सहाय्यक आयुक्त श्री. महेश चौधरी, अमरावती विभागाचे सहाय्यक आयुक्त श्री. सागर तेरकर, नागपूर विभागाचे सहाय्यक आयुक्त श्री. नितीन मोहिते, बृहन्मुंबई विभागाचे सहाय्यक आयुक्त श्री. पराग नलावडे आणि अन्न व औषध प्रशासन आयुक्तालयाच्या अन्न सुरक्षा अधिकारी अर्चना वानरे आदि अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत घेतलेल्या निर्णयामुळे राज्यात भेसळमुक्त अन्न पदार्थ उपलब्ध होऊन जनतेच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या दोषींवर कडक कारवाई सुरू होणार आहे.


Batmikar
मुंबई प्रतिनिधी - केतन खेडेकर

Most Popular News of this Week