वसई-विरार शहर महानगरपालिकेतील भरती प्रक्रियेत वर्षानुवर्षे ठेका पद्धतीने कार्यरत अनुभवी कर्मचाऱ्यांना प्राधान्य देण्याची मागणी आज आमदार सुनिल शिंदे यांनी विशेष उल्लेख सूचनेव्दारे सभागृहात केली !!

        वसई-विरार महानगरपालिकेचे एकूण क्षेत्रफळ ३८० चौ. मी. असून महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना विविध दैनंदिन व महत्त्वाच्या सोईसुविधा देण्यासाठी सद्यस्थितीत कार्यरत असलेला कर्मचारी वर्ग अपुरा पडत आहे. महानगरपालिकेच्या विविध विभागात पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने बाह्य मनुष्यबळ यंत्रणेद्वारे कंत्राटी पद्धतीवर अनेक कर्मचारी घेण्यात आले आहेत. त्यामुळे केंद्र शासनाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उपक्रमांतर्गत वसई-विरार शहर महानगरपालिकेतील रिक्त पदे सरळ सेवा भरती प्रक्रियेद्वारे भरण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या स्थापनेपासून महापालिकेत ठेका पद्धतीने विविध विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सदरहू भरती प्रक्रिया राबविताना कोणताही विचार करण्यात आलेला नाही. त्यामुळे वसई- विरार महानगरपालिकेत ठेका पद्धतीने कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांवर घोर अन्याय करण्यात आला आहे. अत्यंत तुटपुंज्या मासिक वेतनावर गेल्या अनेक वर्षांपासून ठेका पद्धतिने हे कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांना महानगरपालिका सेवेत कायम करण्याची मागणी स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी सातत्याने केली आहे. परंतू शासनाने या गहन प्रश्नाकडे दुर्लक्ष करून सरळ सेवा भरती प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेतल्याने ठेका पद्धतीने कार्यरत कर्मचारी हवालदिल झाले आहेत. ठेका पद्धतीने कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा फायदा करून घेण्यासाठी वसई-विरार शहर महानगरपालिकेतील भरती प्रक्रियेत ठेका पद्धतीने कार्यरत कर्मचाऱ्यांना प्राधान्य देण्यात यावे.


Batmikar
संपादक - अभिषेक शिंदे

Most Popular News of this Week