
भाजपा आता नारायण राणेंना शिवसेनेच्या विरोधात वापरणार ?
भाजपा आता नारायण राणेंना शिवसेनेच्या विरोधात वापरणार ?
केंद्रात महाराष्ट्राला मंत्रिपदे देऊन आगामी निवडणुका लक्षात घेता भाजपाने महाराष्ट्रावर आपली पकड मजबूत करण्याचा हा प्रयत्न गेल्या दीड वर्षापासून चालवलेला आहे, महाराष्ट्रात केंद्र सरकार केंद्रीय यंत्रणेचा वापर मोठ्या प्रमाणात करत आहे. शंभर कोटींचे वसुली प्रकरण महाविकास आघाडी सरकार मधील गृहमंत्री देशमुख यांचे नाव चर्चेत आल्यानंतर त्यांच्यामागे या यंत्रणेचा ससेमिरा लागला. परिवहन मंत्री अनिल परब त्याचप्रमाणे प्रताप सरनाईक यांच्यामागे इ डी सारखी यंत्रणा लावून त्यांच्यावरचा ससेमिरा कायम ठेवलेला आहे. यामुळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत येते काय याच प्रयत्नात भाजपा ने पाठपुरावा केलेला आहे. दरम्यान अधिवेशन काळात गोंधळ घातल्या कारणावरून विधान परिषदेचे भाजपाचे 12 आमदार निलंबित करण्यात आले. यात आशिष शेलार गिरीश महाजन यांच्यासारख्या हुशार आमदारांवर कारवाई झाली. ते भाजपाला सहन झाले नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात केली जात आहे.
भाजपाचे 12 आमदार निलंबित झाल्याने याचा परिणाम आगामी निवडणुकांवर होऊ शकतो याची खात्री भाजपला होती त्यामुळे नुकत्याच पार पडलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळात शिवसेनेसोबत समोरा समोर रोखठोक टक्कर देणारे नारायण राणे यांची वर्णी मंत्रिमंडळात मोदी सरकारने केली आले आहे. एकीकडे मराठा आरक्षणाचा विषय दिल्लीत कोणी तरी लावून धरावा यासाठी मराठा नेते असलेले नारायण राणे यांना केंद्रात मंत्रिपद देण्यात आले आहे ते मराठा आरक्षणाचा पाठपुरावा करतील अशी आशा आहे, भाजपाने राज्य सरकारकडे त्याच प्रमाणे भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि राज्यात मंत्रिपद भूषवलेले रावसाहेब दानवे आणि कपिल पाटील यांची वर्णी केंद्र सरकारात लागल्याने आता महाराष्ट्रात भाजप मजबूत करण्याचा हा एक प्रयत्न आहे. त्यामुळे आगामी महानगरपालिका असो वा इतर निवडणुका भारतीय जनता पार्टी ला फायद्याच्या होतील का अशा चर्चा राजकीय वर्तुळात चालू आहेत.
नारायण राणे हे प्रथमच केंद्रात मंत्री झालेत. त्यांना पक्षाने आणि मोदी - शहांनी केंद्रीय मंत्रीपद देऊन मोठी शक्ती दिली आहे. त्यांच्या मंत्रीपदाचा लाभ पक्षाला मुंबई- कोकणात निश्चितच होईल, याची भाजपला खात्री आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या स्थानिक स्वराज संस्थांमधील निवडणुकीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपने वर्चस्व सिद्ध केले आणि रत्नागिरी जिल्ह्यात भाजपची ताकद लक्षणीय वाढलेली दिसत आहे. यामागे राणे, त्यांचे कुटुंबीय व त्यांच्या कार्यकर्त्यांची फौज यांनी घेतलेले परिश्रम आहेत. पुढील वर्षी मुंबई महापालिकेची निवडणूक आहे आपल्याला राजकीय लाभ किती होईल याची पर्वा न करता, जनहितासाठी स्पष्ट बोलणारा हा नेता आहे. मंत्री आणि मुख्यमंत्री असताना त्यांनी आपल्या कामांचा ठसा उमटवला होता. तसेच विरोधी पक्षनेते असताना आक्रमक पण आदर्श विरोधी नेता कसा असावा, हे त्यांनी महाराष्ट्राला दाखवून दिले होते. शिवसेनेत असताना त्यांनी काँग्रेसला कापरे भरवले होते. आता भाजपमध्ये आल्यावर त्यांनी केलेल्या हल्लाबोलमधून शिवसेनेच्या मंत्र्यांना ताप होत आहे.
डॉ. चिंतामणराव देशमुख, बॅ. नाथ पै, प्रा. मधु दंडवते, अशी कोकणच्या नेत्यांची परंपरा आहे. हीच मालिका नारायण राणे केंद्रीय मंत्री म्हणून आणखी उंचावतील, अशी कोकणवासीयांना आशा वाटते. महत्त्वाकांक्षी आणि कर्तव्यदक्ष असलेल्या नारायण राणेंकडून भाजपला राज्यात मोठे बळ मिळेलच, पण कोकणच्या विकासाला गती मिळेल ही आस लावून कोकणवासी बसलेत.