
नुसतीच दिवाळी नको, ज्ञानदिवाळी साजरी व्हावी !!
करोना महामारीने मार्च २०२० पासून भारतात वेगाने हातपाय पसरण्यास सुरुवात केली. त्यानंतर आजपर्यंत सर्व जाती धर्मांचे वा पंथांचे अनेक सण आले आणि काही किरकोळ घटनांचे गालबोट वगळता सर्वच संबंधितांनी ते सामाजिक बांधिलकीचे भान ठेवून संयमाने साजरे केले. परंतु यात समाधान वाटण्यासारखे काहीच नाही. मार्चमध्ये अचानकपणे लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर लक्षावधी स्थलांतरीतांना अव्यवस्थेमुळे मरणप्राय यातना भोगाव्या लागल्या, रस्त्यात अनेकजण मृत्युमुखी पडले. भारतात आजपर्यंत कोरोना विषाणूने ८० लाखांहून अधिक लोकांना ग्रासले आहे, तर त्यापैकी सव्वा लाखांहून अधिकजण मृत्युमुखी पडून हजारो कुटुंबे निराधार बनली आहेत. त्याखेरीज असंख्य आर्थिक व्यवहार, उद्योग धंदे, व्यापार, नोकरी व्यवसाय, शाळा महाविद्यालये बंद पडून बेरोजगारी, महागाईने सर्वोच्चांक गाठला आहे. भारताची अर्थ व्यवस्था पूर्णपणे खिळखिळी झाली असून त्याचे भयावह परिणाम आता उमटू लागले आहेत. बरे, एकीकडे हे सर्व निसर्ग कोपामुळे झाले असे मानून ओढवलेल्या भीषण परिस्थितीशी झु़ंजावे तर दुसरीकडे माणसेच माणसांवर पाशवी अत्याचार करीत आहेत. स्त्रियांवर पशुवत अमानुष अत्याचार, बलात्कार करून त्यांच्या हत्या करीत आहेत. या पीडितांमध्ये दलित स्त्रियांचे प्रमाण अधिक आहे. हे एव्हडे पुरेसे नाही म्हणून देशभर राजकीय अनागोंदी, हिंसाचाराला ऊत आला आहे. त्यात यावर्षी अतिवृष्टीमुळे आओढवलेल्या महापुरा़ंमुळे देशभरातील अनेक राज्यांतील शेतकरीवर्ग समूळ उद्ध्वस्त झाला आहे. अनेक शेतकरी रोज गळफास लावून घेऊन आत्महत्या करीत आहेत. या अशा स्थितीमुळे लक्षावधी कुटुंबांची उपासमार होत आहे. कोट्यवधी लोकांची घरात साधा दिवा लावण्याची ऐपत नसताना मी मात्र दिवाळी अर्थात प्रकाशाचा सण साजरा करावा इतकाही मी असंवेदनशील नाही. सभोवतालचे हे आगीचे पेटते रिंगण बघून-वाचून- ऐकून मला सतत यातना होत असतात. मन कायम अस्वस्थतेने भारलेले असते. अशा स्थितीत मी माझ्या कुवतीनुसार काही ना काही करून समाजाचे पांग फेडण्याचे प्रयत्न करतो, संबंदात आलेल्या प्रत्येकाला आनंद देण्याचा प्रयत्न करतो. गरजवंताला निरपेक्षपणे या ना त्या स्वरूपात किंवा स्वत: निवृत्त निष्कांचन असूनही अल्प-स्वल्प प्रमाणात आर्थिक मदत करतो. पुस्तकांचा प्रसार व्हावा म्हणून काही दिवाळी अंक किंवा नवी पुस्तके खरेदी करून काही जणांना ती भेट देतो.
"ॲनिमल प्लॅनेट" वाहिनीवर एखादा वाघ अचानकपणे अवतरून शांतपणे चरणाऱ्या कळपातील एखाद्या रेड्यावर झडप घालून त्याला ओढून दूर नेऊन नाहिसा होतो आणि त्या रेड्याचे संख्येने खूप असलेले साथीदार उघड्या डोळ्यांनी ते दृश्य नाके फेंदारत एकवार निर्विकारपणे पाहतात आणि काहीच घडले नाही अशा पद्धतीने पुन्हा मान खाली घालून शांतपणे चरू लागतात. हे दृश्य पाहून खूप वाईट वाटते. कारण आजच्या भारतीय समाजात याचे जागोजागी प्रतिबिंब उमटलेले दिसते.