मध्ययुगीन इतिहासातील काळी बाजू गधेगळ !!

मध्ययुगीन इतिहासातील काळी बाजू गधेगळ !!

        शिवकालीन किंवा पेशवेकालीन ऐतिहासिक मंदिरे किंवा वास्तू यापैकी काही वास्तू त्यापेक्षाही अति प्राचीन काळातील असाव्यात हे इतिहास संशोधकांना मिळत आहेत. त्यापैकी शिलाहार काळातील "गधेगळ"

        गधेगळ, वीरगळ असे शिलालेख मध्ययुगीन शिलाहार राजाच्या राजवटीत अकराव्या ते सोळाव्या शतकात असे शिलालेख कोरण्याची प्रथा निर्माण झाली.मध्ययुगीन शिलाहार राजांच्या सैनिकाला वीरमरण आले असता त्याच्या स्मरणार्थ लाकडाचा किंवा दगडाचा वीर स्तंभ उभारण्यात येत असे त्याला वीरगळ म्हणत तर राजाचा हुकूम अथवा आज्ञा जर कोणी पाळली नाही तर राजाची शापवाणी असल्याचा गळ म्हणजेच गधेगळ!

         गधेगळ हा एक प्रकारचा शिलालेख असतो. हा शिलालेख तीन भागात विभागलेला असतो. वरच्या टप्प्यात चंद्र सूर्य आणि कलश याच्या प्रतिमा कोरलेल्या असतात.

       महाराष्ट्रातील पहिला ज्ञात गधेगळ इसवी सन ९३४ ते १०१२ या काळात होऊन गेलेले शिलाहार राजा "पेशीदेव पहिले " यांनी अलिबाग मधल्या साक्षी येथे उभारल्याची नोंद आहे महाराष्ट्रातील सुमारे ५० टक्के गधेगळ हे शिलाहार राजघराण्याशी संबंधित आहेत यादव घराणं कदंब घराणं, विजयनगरचे संगम घराणं चालुक्य आणि बहामनी साम्राज्याशी निगडित आहेत.

   गधेगळ म्हणजे नेमकं काय?

गधेगळ: राजाचा आदेश पाळला नाही तर गाढवा सोबत संबंध ठेवण्याची विचित्र शिक्षा,!

          जर एखाद्याने राजाची आज्ञा मान्य केली नाही तर त्याच्या कुटुंबातल्या महिलांसोबत गाढवा मार्फत बळजबरी केली जाईल असा धमकी वजा इशारा कोरलेले काही अकराव्या शतकातील शिलालेख महाराष्ट्रात सापडले आहेत.

           मध्ययुगीन काळात महाराष्ट्रात निर्मिलेली मंदिरे शिलालेख ताम्रपट मराठी भाषेतील काही दस्ताऐवज हे त्या काळातील इतिहासावरील पडदा उलगडतात. विशेषतः त्या काळात निर्मिलेली काळ्या बेसॉल्ट खडकातील मंदिरे आणि शिलालेख हे त्या काळातला इतिहास सांगत नाही तर त्या काळाची सामाजिक राजकीय आर्थिक स्थिती दर्शवतात.

           त्यापैकी एक महत्त्वाचा ऐतिहासिक ठेवा शिलालेख म्हणजे गधेगळ हा शिलालेख दहाव्या शतकात शिलाहार राजांच्या महाराष्ट्रातील राजवटीत निर्माण झालेला केवळ एक लेखी पुरावा नाही तर राजाच्या आज्ञेची भीती घालणारा आणि त्या काळातील महिलेची सामाजिक स्थिती दर्शविणारा स्तंभही आहे.

           हा एक प्रकारचा शिलालेख असतो हा शिलालेख तीन टप्प्यात विभागलेला असतो पहिल्या भागात चंद्र सूर्य आणि कलश असतो. दुसऱ्या टप्प्यात मजकूर कोरलेला असतो, आणि तिसऱ्या टप्प्यात शापवणीचे एक शिल्प कोरलेले असते त्यात एक गाढव महिलेवर आरूढ होऊन तिच्याशी बळजबरी समागम करताना दिसतो. अशी प्रतिमा आणि लेख कोरलेला असल्या कारणामुळेच ह्या शिलालेखाला गधेगळ असे नाव पडले.

       शिलालेखावरील आज्ञा अथवा माहिती जर कोणी पाळली नाही तर त्यांच्या घरातील महिलांसोबत असा प्रकार केला जाईल अशी ही धमकी आहे.

       यावर चंद्र सूर्य कोरलेले असतात याचा अर्थ असा की चंद्र सूर्य असेपर्यंत ही आज्ञा कायम राहील!  म्हणून त्यावर चंद्र सूर्य कोरलेले असतात.

       गधेगळ दहाव्या शतकापासून ते सोळाव्या शतकापर्यंत महाराष्ट्रात आढळतात. हा शिलालेख दुर्मिळ असून महाराष्ट्र, गोवा, गुजरात, तर काही शिलालेख बिहार या राज्यातही आढळलेले आहेत. केवळ दीडशेच्या आसपास गधेगळ सापडलेले आहेत.

       गधेगळवर महिलांचीच प्रतिमा का?

      गघेगळाचा संबंध हा महिलांच्या स्थानाविषयी आहे ?

     त्या काळात सामाजिक परिस्थिती बिकट अवस्थेत पोहोचली होती, दख्खन प्रदेशात राज्यसत्ता बळकट करण्यासाठी सतत संघर्ष सुरू होता. सामंतशाहीवादी राजे जनतेवर आपला अंमल करण्याचा तरी तऱ्हेने प्रयत्न करीत होते.

               जाती व्यवस्था आणि चातुर्वर्ण्य समस्येने समाजाला घेरलं होतं. अंधश्रद्धा समाजात शिगेला पोहोचली होती. तर ह्याच काळात मराठी भाषा आकार घेऊ लागली होती, यावेळी महिलेला कोणतच सामाजिक स्थान नव्हतं उलट ते खालावलेलं होतं.

               त्याकाळी जरी महिला आई बहीण पत्नी किंवा देवीचे रूप असली तरी, तिला समाजात काही स्थान नव्हतं, म्हणून गधेगळावर महिलेची प्रतिमा कोरलेली असायची. कारण एखाद्या व्यक्तीने गधेगळावर लिहिलेल्या मजकुराचे पालन केलं नाही अथवा त्याला विरोध केला तर त्या व्यक्तीच्या घरातील महिले सोबत अशा रीतीने बळजबरी केली जाईल, असा याचा अर्थ होता.

               एखाद्या व्यक्तीच्या घरातील महिलेसोबत असा प्रकार झाल्यास त्या व्यक्तीचं समाजातील स्थानही डळमळीत होईल. त्यामुळे घाबरून कोणीच हे कृत्य करणार नाही, असा त्या मागचा अर्थ होता.

               प्रत्यक्षात असा प्रकार कधी घडला की नाही याबाबत माहिती उपलब्ध नाही. तरी एखाद्याला शिक्षा म्हणून महिलेची विटंबना केली जाईल अशी राजा कडून आलेली धमकीच होती. आपण दिलेल्या आज्ञेच गांभीर्य जनतेच्या मनात ठसल जावं यासाठी मध्ययुगीन महाराष्ट्रातल्या राजांकडून अशी शिल्प शिलालेखात कोरली जात होती. असं एकंदरीत मत पुरातत्त्वज्ञांनी व्यक्त केल आहे.

               त्यामुळे आजच्या काळात असलेली लैंगिक अत्याचाराची भीती मध्ययुगीन काळातील स्त्रियांनाही होती हे यावरून स्पष्ट होते

         गधेगळाचे आजचे महत्व काय?

      गधेगळावरून आत्ताच्या काळात अंधश्रद्धा निर्माण झाल्या आहेत. गाढव आणि महिलेला अशा स्थितीत पाहून काही त्यांना या काळात अशुभ मानतात. तर काहीजण त्याला शेंदूर पासून त्याची पूजा करतात. गिरगावातील पिंपळेश्वर मंदिरा बाहेर सापडलेल्या गधेगळाची व मुंबईतील गोराई येथे सापडलेल्या गधेगळाची लोक अंधश्रद्धेमुळे पूजा करतात .

          तर काहींनी ते अशुभ मानून फोडून टाकले आहेत. त्यामुळे गधेगळ ज्या ठिकाणी आढळतो त्या जागेला अनन्य साधारण ऐतिहासिक महत्त्व आहे.काही गधेगळ हे मराठी भाषेत असतात, मराठी भाषेचा इतिहास त्यांच्यामुळे उलगडता येतो, काही गधेगळ अरबीभाषेतही आहेत, त्याच्या अभ्यासामुळे मध्ययुगीन भाषिक इतिहासावरही प्रकाश टाकता येतो.

          त्यामुळे गधेगळ सापडल्यास ते नष्ट करणे अथवा फोडून टाकणे , किंवा  त्याची पूजा करणे अशा अंधश्रद्धा बाळगण्यापेक्षा त्याचा ऐतिहासिक वारसा जपणे अथवा समजून घेणे हे अधिक महत्त्वाचं आहे!!

          मुंबईत गिरगावातील पिंपळेश्वर मंदिरा बाहेर, अंबरनाथ येथील हाजी मलंग जवळील आदिवासी वाडीत, मुंबईतील गोराई गावात, तसेच बदलापूर येथील शिरगावातील निसर्ग उद्यानात गधेगळ स्मारकात हे शिलालेख पाहवयास मिळतात.


Batmikar
वार्ताहर - प्रीती तिवारी