
मनसेच्या नवीन 'राजमुद्रा' छापलेल्या झेंड्याला संभाजी ब्रिगेडचा विरोध !
मनसेच्या नवीन 'राजमुद्रा' छापलेल्या झेंड्याला संभाजी ब्रिगेडचा विरोध !
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मूळ पहिला झेंडा हा चार रंगाचा होता. जातीच्या नावावर मत मागण्यासाठी वेगवेगळ्या रंगाचा वापर केला गेला. परंतु त्यांना यश आलं नाही. राजकारणात चढ उतार होत असतात परंतु मतासाठी जाती धर्माचा उपयोग करून झेंड्याचा रंग सुध्दा (सरड्यासारखे) सतत बदलतात, असे 'रंग' राजकारणात बदलता येत नाही. मनसेने आता नवीन 'भगवा झेंडा' निर्माण करून त्यावर 'राजमुद्रा' छापलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची 'राजमुद्रा' ही राजकारण करण्याचे साधन नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी राजमुद्रेची निर्मिती केलेली आहे. त्या राजमुद्रेचा वापर कुठल्याही पक्षांनी राजकारण करण्यासाठी करू नये... अशी मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड ची स्पष्ट भूमिका आहे. म्हणून मनसेच्या झेंड्यावर राजमुद्रा छापण्यास संभाजी ब्रिगेडचा तीव्र विरोध आहे. मनसेचे अध्यक्ष मा. राजसाहेब ठाकरे यांनी समतेचा भगवा झेंडा घेतला असेल तर स्वागत करू...! आम्ही भारतीय संविधान व लोकशाही मानणारे व्यक्ती आहोत.
परंतु *'राजमुद्रा'* वापरणं हे महाराष्ट्रातील शिवअनुयायी व संभाजी ब्रिगेड कधीही सहन करणार नाही. भगवा झेंडा हा समता आणि बंधुतेचा प्रतीक असून तथागत बुध्द, छत्रपती शिवाजी महाराज, संत तुकाराम महाराज यांनी देखील वापरला आहे. त्यामुळे भगवा वापरण्यावर संभाजी ब्रिगेड चा विरोध नसून राजमुद्रा असलेला झेंडा वापरण्यावर संभाजी ब्रिगेड चा विरोध आहे. ही संभाजी ब्रिगेडची ठाम भूमिका आहे,
मनसेने झेंड्यावरील राजमुद्रा न काढल्यास लवकरच आम्ही योग्य ती पावले उचलू असे संभाजी ब्रिगेड चे दक्षिण मुंबई जिल्हा प्रभारी अध्यक्ष विजय बल्लाळ यांनी सांगितले.