
मुंबई वाहतूक पोलिसांनी चांगलीच नामी युक्ती शोधून काढली !
मुंबई - मुंबईत वाहतूक कोंडी, ध्वनी प्रदूषण काही थांबण्याचे नाव घेत नाही.मुंबई शहरात आजूबाजूच्या शहरातून येणार वाहतुकीचा लोंढा मोठ्या प्रमाणात असतो. त्यामुळे मुंबईला वाहतूक कोंडी आणि वाहतुकीमुळे प्रदूषण होत असते. वाहन चालक लाल सिग्नलवरही हॉर्न वाजवत असतात. आता या समस्येवर मुंबई पोलिसांनी चांगलीच नामी युक्ती शोधून काढली आहे.
मुंबई पोलिसांकडून प्रायोगिक तत्त्वावर काही निवडक ठिकाणच्या ट्राफिक सिग्नलवर चौकोनी आकाराचे डेसिबल मीटर बसवले जाणार आहेत. या नव्या मीटरमुळे जर सिग्नल रेड असताना तुम्ही गाडीचा हॉर्न वाजवला, तर त्या हॉर्नच्या ध्वनी तीव्रतेची नोंद या मीटरमध्ये होईल. त्यानंतर अवघ्या काही सेंकदाच समोरील सिग्नल पुन्हा रिसेट होईल.
यामुळे तुम्ही जितक्या जास्त वेळा हॉर्न वाजवणार, तितक्या वेळा तो रेड सिग्नल पुन्हा पुन्हा रिसेट होणार आणि तितका वेळ तुम्हाला तुमच्यासोबत इतरांनाही त्या सिग्नलवर ताटकळत उभे राहावे लागणार आहे, असा हा नवा फंडा मुंबई पोलिसांनी शोधून काढला आहे.याबाबतचा एक व्हिडीओही मुंबई पोलिसांच्या वतीने शेअर करण्यात आला आहे. उगा कशाला हॉर्न वाजवी..काना येईल बहिरेपणा..वृद्ध, बालक अन् कुणी आजारी..फिकीर त्यांची करा जरा..असे या व्हिडीओवर म्हटले आहे.त्यामुळे आता सर्वच मुंबईकरांनी सिग्नलसारखा रिसेट होऊ द्यायचा आणि ताटकळत तिथेच उभे राहायचे. की लगेच आपल्याला जिथे जायचे आहे तिथे लवकरात लवकर पोहोचायचे याचा विचार करावा, असेही मुंबई पोलिसांतर्फे सांगितले जात आहे.