
रहिवाशांच्या आरोग्यास धोकादायक असलेल्या कचराकुंड्या लोअरपरळ मधून हटवा !
रहिवाशांच्या आरोग्यास धोकादायक असलेल्या कचराकुंड्या लोअरपरळ मधून हटवा !
बाबाजी जामसांडेकर मार्गावरील कचराकुंडीचे सुशोभिकरण करण्याचे महापालिकेच्या जी - साऊथ विभागात घाटत असल्याचे कळते.
परंतु या कचरा कुंडीसभोवताल असलेल्या मानाजी राजुजी चाळी, वकील चाळी इत्यादींचे पुनर्विकसिकरण अत्यंत वेगाने सुरू असून त्या प्रक्रियेअंतर्गत या चाळी पाडण्यात आल्या आहेत. त्याचरितीने तुळशी बिल्डींगचाही पुनर्विकास घडवून आणण्याची प्रक्रिया अत्यंत वेगात असून तीही अंतिम टप्प्यात पोहोचली असल्याने लवकरच येथे रहिवाशांना अभिमानास्पद वाटावेत असे या परिसराचे सौंदर्य वाढवून मानबिंदू ठरणारे, परिसराचे मूल्य, प्रतिष्ठा वाढविणारे, रहिवाशांचे जीवनमान उंचावणारे ऊंचच ऊंच टॉवर्स सुंदर उभे राहणार आहेत. त्यामुळे सध्या येथील रहिवाशांचे अन्यत्र संक्रमण झालेले असल्याने बाबाजी जामसंडेकर मार्गावरील कचरा कुंडीची गरज संपलेली आहे. म्हणूनच तिचे सुशोभिकरण करणे अनावश्यक, वायफळ ठरते.
मुळात "कचराकु़ंडी" ही संकल्पना आजच्या आधुनिक काळात कालबाह्य ठरलेली असल्याने वातावरण प्रदूषणात भर टाकणाऱ्या अशा गोष्टी टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करणे मागासलेपणाचे लक्षण आहे. आपले आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी "स्वच्छता अभियान" राबवण्याचे जीवतोडून प्रयत्न करीत असताना त्या पार्श्वभूमीवर "कचराकु़ंडी"चे संगोपन करण्याचा प्रयत्न करणे अव्यवहार्य वाटते.
मुळात विकसित क्षेत्रात अशा कचरा कुंड्यांचे जतन करणे आजच्या प्रगत काळात मागासपणाचे लक्षण मानले जाते.
उपरोक्त टॉवर्समधील रहिवाशांच्या सहकारी गृहनिर्माण संस्था स्थापन केल्या जाणार असून त्यांच्या वतीने आधुनिक पद्धतीने स्वतंत्रपणे कचराव्यवस्थापन केले जाईल जसे मुंबईतील अन्य विकसित क्षेत्रात केले जाते. मुळात भर रस्त्यात आणि भर रहिवासी वस्तीत अशा रोगराई पसरविणाऱ्या दुर्गंधीयुक्त कचराकुंड्या ठेवल्या मुळे साथीच्या रोगांचा प्रसार होऊन सार्वजनिक आरोग्यास गंभीर धोका पोहोचतो. म्हणूनच आपल्या सारख्या प्रगत, सुशिक्षित, समाजभान असलेल्या नागरिकांनी कचराकुंड्यांं जतन करण्याच्या जुनाट पद्धतीस उत्तेजन देणे उचित नव्हे. मुंबई नागरी विभागात ओला कचरा - सुका कचरा यांचे व्यवस्थापन करणे नागरी आरोग्य आणि पर्यावरण प्रदूषण रक्षण यासंदर्भात आधीच मोठी गंभीर समस्या आहे. त्यात कचराकुंड्यांचे जतन करून ही समस्या अधिक अक्राळविक्राळ बनविण्यास साहाय्य करणे बेजबाबदारपणाचे लक्षण आहे. त्यासाठी गरज असेल तरच आपण कचराकुंड्या न ठेवता कचरा गोळा करणाऱ्या महापालिकेच्या घंटा गाडीच्या व्यवस्थेसाठी उत्तेजन द्यावे हे उत्तम. आपल्या लोकप्रिय महापौर सन्माननीय सौ. किशोरीताई पेडणेकर यांचे या संदर्भात मार्गदर्शन घेतल्यास त्या स्वतःच याबाबतीत पुढाकार घेतील असे मला वाटते. सार्वजनिक आरोग्याचे जतन करण्याचा प्रयत्न करणे हे सुद्धा आपले नागरीक कर्तव्य आहे.
संपादक : अशोक सावंत (समुद्र - हेलोसखी)