
वाढवण बंदराच्या विरोधासाठी व भूमिपुत्रांच्या न्याय हक्कासाठी जन्मभूमीच्या रक्षणासाठी वाढवन बंदर पालघर येथील मोर्चात सहभागी व्हा !
वाढवण बंदराच्या विरोधासाठी व भूमिपुत्रांच्या न्याय हक्कासाठी जन्मभूमीच्या रक्षणासाठी वाढवन बंदर पालघर येथील मोर्चात सहभागी व्हा !
मुंबई (दि.२९ऑगस्ट) केंद्र सरकारने बंदर अधिनियम 2020 च्या माध्यमातून बंदर विकासाची नवीन नियमावली जाहीर केलेली आहे. 1995 ते 96 साली खऱ्या अर्थाने वाढवण या डहाणू तालुक्यातील गावात एका ऑस्ट्रेलियन कंपनीच्या माध्यमातून बंदर उभारण्याची घोषणा करण्यात आली होती. त्यावेळी हरित लवादाच्या प्राधिकरणाने वाढवण बंदराच्या बाजूने निर्णय दिल्यामुळे वाढवण बंदराचा विषय दप्तरी दाखल करून सर्व प्रक्रिया बंद करण्यात आलेल्या होत्या. परंतु 2014 सालापासून केंद्रात सत्ता परिवर्तन झाल्यामुळे वाढवण बंदराच्या प्रकल्पाला पुन्हा नवीन गती देण्याचे काम करण्यात आलेले आहे. परंतु 2020 साली प्राधिकरणाच्या झालेल्या सुनावणीनंतर राजकीय दबाव तंत्र वापरून प्राधिकरणाच्या बाजूने निर्णय देण्यात आला. खऱ्या अर्थाने पाहता या बंदराचा अधिक फायदा हा महाराष्ट्र राज्यापेक्षा गुजरात राज्यालाच जास्त होणार आहे. परंतु गुजरात राज्यात सदर बंदरास होणारा विरोध लक्षात घेता हे बंदर महाराष्ट्रात बांधून त्याचा प्रत्यक्ष फायदा मात्र गुजरात तटीय क्षेत्रांनाच होणार आहे. असे स्पष्ट मत महाराष्ट्र राज्य मच्छीमार सेवा संघाचे अध्यक्ष रवींद्र पांचाळ यांनी व्यक्त केले आहे.
त्यामुळे येत्या रविवारी होणाऱ्या वाढवण बंदर, पालघर येथील मोर्चात राज्यातील मच्छीमार बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहनही पांचाळ यांनी केले आहे.
भारताचे पंतप्रधान हे गुजरात राज्याचे मुख्यमंत्री राहिले आहेत. त्यामुळे प्रत्यक्ष गुजरातमध्ये प्रकल्प न राबवता गुजरात राज्याचा कसा फायदा होईल हे पाहिले जात आहे. यामुळे केंद्र सरकारच्या माध्यमातून दबावतंत्र वापरून हे बंदर निर्माण करण्याचं कटकारस्थान या न्यायालयीन लढ्याच्या माध्यमातून केला जात आहे. ह्या निकालानंतर आता मोठ्या प्रमाणात अधिकार हे बंदर प्राधिकरणाला दिले आहेत. त्यानुसार आता राज्य सरकारची कोणतीही पूर्व परवानगी न घेता बंदर विभाग कोणत्याही समुद्र किनाऱ्यावरील जागेचा प्रत्यक्ष ताबा तसेच समुद्रातील अथवा खाड्या, नद्यांचे अधिग्रहण करू शकतात. त्याकरिता केंद्रीय सुरक्षा दलाची मदत केंद्रीय बंदर प्राधिकरण घेऊ शकते.
वरील विषय आपणास अवगत करण्याचा उद्देश फक्त एवढाच आहे की मुंबईतील आपल्या मच्छीमार वसाहती ह्या आपल्या कर्मभूमी जरी असल्या तरी आपल्या जन्मभूमी या पालघर जिल्ह्यातील 96 गावे आहेत. त्यात प्रामुख्याने असलेल्या सातपाटी, केळवे, दातीवरे, कोरे, एडवण, तारापूर, टेंभी, नवापूर, खारेखुरण, डहाणू अशा विविध गावंचा समावेश आहे. हया गावात राहून आपण लहानाचे मोठे झालो व आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करिता आपल्या उज्वल भविष्याकरिता आपण स्थलांतरित होऊन मुंबईच्या कफ परेड, सुदाम झोपडी, आझाद नगरी, तसेच मुंबईतील विविध भागात मोठ्या प्रमाणात आलेले आहेत. परंतु आपले नातेवाईक, समाज बांधव आपले कुटुंबीय ह्या 96 गावात आजही राहत आहेत. वाढवण बंदराच्या माध्यमातून पालघर जिल्ह्याला ग्रहण लागण्यास सुरुवात झालेली असून आपण वेळीच खबरदारी न घेतल्यास वाढवण रुपी राक्षस आपल्या विस्तारात आपली 96 गावे गिळंकृत केल्याशिवाय गप्प बसणार नाही. हे आपण लक्षात घेणे खूप गरजेचे आहे. समाज बांधवांनो आज आपल्याला पालघर जिल्हा आपल्याला मदतीचा हात मागतोय त्याच्या मदतीकरिता व आपले नातेवाईक, कुटुंबीय, मित्रपरिवार त्यांच्यावर विस्थापित होण्याची वेळ वाढवण बंदराच्या माध्यमातून आलेली आहे. अशी वेळ त्यांच्यावर येऊ नये असेही पांचाळ यांनी म्हंटले आहे.